हृदयस्पर्शी गुडबाय! सचिनसह त्याच्या चाहत्यांच्याही अश्रूंचा बांध फुटला
अशा या भावपूर्ण वातावरणात आई-वडिलांसह सामान्य चाहत्यांचे आभार मानल्यानंतर सर्वांत शेवटी खेळपट्टीला केलेला नमस्कार क्रिकेटविश्वाला भावनाविवश करणारा ठरला. "सचिन...सचिन', असा आसमंत दुमदुमणारा जयघोष क्रिकेटच्या दैवतासमोर नतमस्तक होणारा ठरला.
मुंबई : वेळ होती दुपारी 11 वाजून 47 मिनिटांची, आकाशात असलेला सूर्य मध्यान्ही आलेला असतानाच वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास झाला आणि त्याच क्षणी क्रिकेटमधील एका युगाचा अस्त झाला... त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर जे घडले ते होते केवळ अभूतपूर्व आणि अविस्मरणीय! गेली 24 वर्षे ज्या "मास्टर'ने आपल्या खेळातून आनंद आणि हसू दिले, त्या "मास्टर'ला अश्रू आवरत नव्हते. जागच्या जागी उभे राहिलेले त्याचे चाहते अंतर्मुख झाले होते...
IPL 2020 : कोणत्या संघाने वगळले कोणते खेळाडू? पाहा पूर्ण यादी
अशा या भावपूर्ण वातावरणात आई-वडिलांसह सामान्य चाहत्यांचे आभार मानल्यानंतर सर्वांत शेवटी खेळपट्टीला केलेला नमस्कार क्रिकेटविश्वाला भावनाविवश करणारा ठरला. "सचिन...सचिन', असा आसमंत दुमदुमणारा जयघोष क्रिकेटच्या दैवतासमोर नतमस्तक होणारा ठरला.
भारतीयच नव्हे, तर क्रिकेट विश्वात आजचा दिवस आणि वानखेडे स्टेडियमवरील वातावरण "न भूतो न भविष्यती' असे होते. 2 एप्रिल 2011 रोजी धोनीच्या संघाने विश्वकरंडक जिंकल्यावर झालेला जल्लोष केवळ आनंद आणि आनंदच देणारा होता. त्या वेळीही सचिनला खेळाडूंनी खांद्यावर घेऊन त्याला मानवंदना दिली होती, आजही त्याला खांद्यावर घेऊन अशीच सन्मान फेरी मारण्यात आली पण या वेळी विराट कोहली, रोहित शर्मा या नव्या पिढीच्या खेळाडूंसह सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यांत आसू होते. कारण, यापुढे क्रिकेटच्या दैवताला कधीही क्रिकेटच्या मैदानात खेळताना न पाहता येण्याचे सत्य त्यांना पचविताच येत नव्हते.
वेस्ट इंडीजचा उर्वरित डाव संपुष्टात आणून भारतीय संघाने डावाने विजय मिळविला खरा, पण कोणालाही विजयाचा आनंद होत नव्हता. एकवी मालिका जिंकल्यानंतर आपल्या शैलीत विजयोत्सव करणारा "अँग्री यंग मॅन' विराट कोहली आज धीरगंभीर झाला होता. मिशा पिळून आपली बहादुरी दाखविणारा शिखर धवनही अबोल झाला होता. या दोघांनी सचिनला खांद्यावर घेऊन आपल्या या लाडक्या हीरोबाबत दाखविलेला आदर प्रेक्षकांच्याही नजरेतून सुटत नव्हता.
खरे तर आजच्या दिवसाचा खेळ हा केवळ औपचारिकता असलेला असला तरी आपल्या लाडक्या सचिनला निरोप देण्यासाठी संपूर्ण स्टेडियम भरलेले होते... सचिनच्या निरोपाचे त्यांना साक्षीदार व्हायचे होते. तो क्षण ज्या वेळी आला तेव्हापासून ते सचिन टीमच्या गाडीतून स्टेडियममधून बाहेर जाईपर्यंत वानखेडेवरील वातावरण अतिशय भारावलेले होते. वेस्ट इंडीजचा एकेक फलंदाज जस जसा बाद होत होता, तस तशी सचिनची पावले जड होत होती. अखेरचा फलंदाज बाद झाल्यानंतर सचिनने हात हवेत उंचावून आपल्या सहकाऱ्यांसह विजयाचा आनंद व्यक्त केला खरा, पण त्याचवेळी आपल्या खेळाला पूर्णविराम मिळाल्याचीही त्याला जाणीव झाली; परंतु आपल्या कृतीतून त्याने जराही याची जाणीव करून दिली नाही. पॅव्हेलियनमध्ये गेल्यानंतर सचिन ढसाढसा रडत होता. अजूनपर्यंत रोखून धरलेल्या आपल्या भावनांना तो त्याक्षणी आवर घालू शकला नाही. त्यामुळे बक्षीस समारंभ लांबवावा लागला.
INDvsBAN : मयांकने मोडला दी ग्रेट पुजाराचा मोठा विक्रम
सचिनला खेळाडू म्हणून मैदानातून परतताना पाहताना प्रेक्षक जागच्या जागी स्तब्ध झाले होते. कमालीची शांतता स्टेडियममध्ये पसरली होती...काहींच्या डोळ्यांत आसवे होती, तर काहींना हुंदके आवरत नव्हते. बक्षीस समारंभानंतर सचिनने आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी जेव्हा माईक हातामध्ये घेतला तेव्हा तर "सचिन...सचिन' या घोषाने वानखेडेचा आसमंत दणाणून गेला होता.
सचिन आपल्या भावनांची लडी उलघडत होता "वंडरबॉय' सचिनपासून "मास्टर ब्लास्टर' सचिनपर्यंतच्या प्रवासात त्याच्या पाठीशी राहिलेल्या, मायेचा हात पाठीवर ठेवलेल्या वडील आणि आईपासून त्याने कृतज्ञता व्यक्त करण्यास सुरवात केली, ते त्याचे प्रत्येक शब्द अनेकांच्या काळजाला भिडत होते आणि अर्थातच त्याचे रूपांतर आसवांमध्ये होत होते. एरवी आपल्या भावना कधीही जाहीरपणे न व्यक्त करणारी सचिनची पत्नी अंजलीही जेव्हा सचिनने तिच्या नावाचा उल्लेख केला, त्या वेळी तिलाही अश्रू आवरता आले नाहीत.
आपल्या जुन्या सहकाऱ्यांनाही सलाम करताना सचिनने समालोचनासाठी उपस्थित असलेल्या राहुल द्रविड, सौरभ गांगुली, लक्ष्मण आणि कुंबळे यांचा उल्लेख केला त्या वेळी द्रविडचेही डोळे पाणावले होते. इतके हृदयस्पर्शी असलेले सचिनचे मनोगत त्याच्या मनाचा मोठेपणा दाखवत होते. सचिन 20 मिनिटांहून अधिक काळ भरभरून बोलत होता. आपला कंठ दाटून येणार याची त्याला जाणीव होती म्हणून सोबत तो पाण्याची बाटलीही घेऊन आला होता.
स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या आणि जागेवरहून इंचभरही न हललेल्या आपल्या प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी सचिनची "व्हिक्टरी लॅप,' "राजा की निकली सवारी' अशी राजेशाही होती. हे सर्व झाल्यानंतर सचिन सर्वांना मागे ठेवून एकटाच खेळपट्टीवर गेला, दोन हात लावून त्याने खेळपट्टीला केलेला नमस्कार, हा तर या निरोपाचा परमोच्च क्षण होता. त्या क्षणापासून पुन्हा पॅव्हेलियनमध्ये जाईपर्यंत पाणावलेल्या डोळ्यांनीच सचिनने क्रिकेटला अलविदा केला.